28 Jul 2026, Tue

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला नवी गती !! ५,०१० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न..

समग्र प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी राज्यभर दोन दिवसीय उजळणी प्रशिक्षण शिबिरे..

राज्यात ११६ प्रशिक्षण बॅचेस पूर्ण; ५,०१० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न..

न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..

पुणे / मुंबई दि. ७ जुलै :- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आणि राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्या सनियंत्रणाखाली सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आयुष्मान भारत – समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) अंतर्गत राज्यातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी दोन दिवसीय उजळणी प्रशिक्षण शिबिरांचे राज्यव्यापी आयोजन करण्यात आले आहे. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला अधिक प्रभावीपणे गती देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.

राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आशा पर्यवेक्षक आणि आशा स्वयंसेविका अशा प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणामध्ये सहभागी करून घेतले जात आहे. प्राथमिक आरोग्य सेवा अधिक परिणामकारक, अद्ययावत आणि रुग्णकेंद्रित करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि प्रत्यक्ष कामकाजातील सुधारणा या प्रशिक्षणातून दिल्या जात आहेत.

राज्यात आजपर्यंत ११६ प्रशिक्षण बॅचेस यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून ५,०१० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्रत्येक जिल्ह्यातून १० प्रशिक्षकांची निवड करून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणाची गुणवत्ता, एकसमानता आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अनुभवी मेंटर्स तसेच जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रशिक्षणाची विशेष बाब म्हणजे केवळ वर्गातील व्याख्यानांपुरते प्रशिक्षण मर्यादित न ठेवता प्रात्यक्षिकांवर आधारित अध्यापन आणि समुदाय सहभागावर आधारित प्रत्यक्ष प्रशिक्षण यावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष गावामध्ये गृहभेटी, नागरिकांशी आरोग्य संवाद, कुटुंबांना आरोग्यविषयक मार्गदर्शन, आजारांचे लवकर निदान, जोखीम असलेल्या व्यक्तींची ओळख आणि आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा याविषयी प्रत्यक्ष अनुभव दिला जात आहे.

आयुष्मान भारत अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिरांमार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या समग्र प्राथमिक आरोग्य सेवेच्या १३ सेवा पॅकेजेस या प्रशिक्षणात सविस्तर शिकविण्यात येत आहेत. यामध्ये मातृ व बाल आरोग्य, नवजात शिशु सेवा, किशोरवयीन आरोग्य, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन, मानसिक आरोग्य, वृद्धापकाळातील आरोग्य सेवा, आपत्कालीन आरोग्य सेवा, नेत्र व कर्ण आरोग्य, मौखिक आरोग्य, योग व आयुष उपचार पद्धती, आरोग्य संवर्धन, गुणवत्ता सुधारणा, डेटा व्यवस्थापन, अहवाल लेखन आणि समुदायाधारित आरोग्य सेवा वितरण यांचा समावेश आहे.

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावात आरोग्याची लोकचळवळ उभारण्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा संकल्प असून, त्यासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि संवेदनशील मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरत आहे. प्रशिक्षणानंतर आयुष्मान आरोग्य मंदिरांमार्फत नागरिकांना अधिक दर्जेदार, सर्वसमावेशक, सुलभ आणि रुग्णाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यभर राबविण्यात येत असलेले हे प्रशिक्षण अभियान प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्यास, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला चालना देण्यास आणि प्रत्येक गाव ‘आरोग्यसंपन्न गाव’ बनविण्याच्या उद्दिष्टपूर्तीस निश्चितच मोलाचे योगदान देणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!