गट ग्रामपंचायत दर्शनी (माल) येथे घनकचरा शेडमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार?
अतिशय निकृष्ट दर्जेचा व अपूर्ण काम पूर्ण दाखवून ₹1.52 लाखांची रक्कम केले लंपास..!
न्यू विदर्भ केसरी / फुलचंद वाघाडे..
गडचिरोली :– केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक गावात घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र गट ग्रामपंचायत दर्शनी (माल) येथे उभारण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन शेडच्या कामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित काम अपूर्ण असतानाही बनावट मोजमाप पुस्तिका (MB) तयार करून काम पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले आणि सुमारे ₹1 लाख 52 हजार रकमेचा अपहार करण्यात आला. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार दाखल केल्यानंतर चौकशीही करण्यात आली. चौकशीदरम्यान मंजूर अंदाजपत्रकातील कामे आणि प्रत्यक्षात झालेली कामे यामध्ये मोठी तफावत आढळून आल्याचे सांगितले जात आहे.
घनकचरा शेडमध्ये ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक व काच यांचे वर्गीकरण करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच जाळीदार दरवाजा, प्लास्टर भिंत आणि इतर मूलभूत कामेही अपूर्ण असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रत्यक्ष कामाची किंमत अंदाजे ₹30 ते ₹35 हजार इतकी असू शकते, असेही काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, चौकशी होऊनही अनेक महिने उलटून गेले तरी संबंधित दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गावात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, सांडपाण्याच्या तुंबलेल्या नाल्या आणि दुर्गंधीमुळे स्वच्छता अभियानाच्या उद्दिष्टालाच हरताळ फासला जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. ग्रामस्थांनी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, गैरव्यवहाराची रक्कम वसूल करावी आणि गावासाठी दर्जेदार व प्रभावी घनकचरा व्यवस्थापन शेड उभारावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा न्यायालयात याचीका सादर करण्यात येईल.

